औरंगाबाद- राज्याचीपर्यटन राजधानी औरंगाबाद शहरातील कच-याच्या समस्येवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत. शहरातील कच-याचे ढिगारे हे पर्यटनासाठी मारक असल्याची टीका करतानाच हे टाळण्यासाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतेसाठी कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता महामंडळाने व्यक्त केली. शहरातील खराब रस्त्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील कच-याच्या समस्येची पर्यटन व्यवसायाशी सांगड घालून पालिकेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ आहे. एमटीडीसीचे मावळते व्यवस्थापकीय संचालक डॉ.जगदीश पाटील यांनी मावळते पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना ३१ जुलै रोजी पाठवलेल्या एका पत्रात शहरातील कच-यामुळे पर्यटन व्यवसायावर होणा-या दुष्परिणामाबाबत तळमळ व्यक्त केली आहे.
कायआहे पत्रात ?
पत्रातडॉ.पाटील म्हणतात, औरंगाबाद हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. जागतिक पर्यटन वारसा असणा-या वेरूळ, अजिंठा लेणी दौलताबाद किल्ला, मकबरा, पाणचक्की, घृष्णेश्वर मंदिर, पैठण, खुलताबाद या पर्यटनस्थळांना पर्यटक भेट देतात. मात्र, खराब रस्ते अस्वच्छता पर्यटनाला मारक ठरण्याची शक्यता आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला जावा.
स्वच्छतेचे मोठे आव्हान
औरंगाबादहे देशी परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. परंतु इथल्या कच-यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याचा मोठा धोका आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. हे निश्चित मोठे आव्हान आहे. त्यात हातभार लावण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था तयार आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. एमटीडीसीही यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे. हे सांगण्यासाठीच पालिका आयुक्तांना पत्र पाठवावे लागले. डॉ.जगदीशपाटील, एमडी,एमटीडीसी