औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (सोमवार, मे) शहरात येत असून महापालिकेच्या वतीने त्यांच्याकडे शहराच्या विकासासाठी खासकरून रस्त्यांसाठी विशेष निधी मागितला जाण्याची शक्यता आहे.
दरवेळी मुख्यमंत्री औरंगाबादेत आले की मनपाच्या वतीने महापौर मनपाचे पदाधिकारी त्यांच्याकडे निधी देण्याची मागणी करणारे पत्र द्यायचे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना प्रत्येक वेळी मनपाकडून निधीची मागणी केली जायची; पण एकदाही त्यानुसार सरकारने निधी दिला नव्हता. कला ओझा महापौर असतानाच्या काळातच मुख्यमंत्र्यांना एकूण १७ वेळा पत्र देण्यात आले. प्रारंभी तीन वेळा मोठी पत्रे देण्यात आली; पण त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने नंतर प्रत्येक वेळी एकाच मजकुराची स्मरणपत्रे क्रमांक टाकून देण्यात आली होती.
मनपा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे आता मनपात आम्हाला निवडून द्या, भरपूर निधी मिळेल, असे आवाहन करत मतदारांकडे मते मागितली होती. आता उद्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात येत आहेत. तेथे महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ उपस्थित असणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या खास भेटीसाठी वेळही मागण्यात आली आहे. उद्याच्या निवेदनात १०० कोटी रुपयांहून अधिक निधी मागण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.