औरंगाबाद - सात अब्ज रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, असे कोणालाही सांगितले तर आश्चर्य वाटेल; परंतु हे वास्तव आहे. १०० रुपये इतका खर्च असलेले जेसीबीच्या टायरचे पंक्चर काढण्यासाठी या संस्थेकडे पैसे नसल्याचे समोर आले. त्यामुळे कचरा जमा करण्याचे काम करणारे जेसीबी तीन दिवसांपासून उभे आहे. नूतन सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्यासमोर हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आधी अत्यावश्यक कामांसाठी पैसे राखून ठेवा, अशी सूचना लेखा विभागाला केली. मनपातील सहा वॉर्डांसाठी कचरा संकलनास करण्यास प्रत्येकी दोन जेसीबी आहेत. तांत्रिक विभागाने याची देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, तेही होत नसल्याचे मंगळवारी जंजाळ यांनी घेतलेल्या बैठकीत समोर आले.
गुलमंडी परिसरातील कचरा उचलण्याचे काम होत नसल्याचे समजल्यानंतर जंजाळ यांनी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीन दिवसांपासून जेसीबी एकाच ठिकाणी उभे असल्याचे समजले. असे का, या प्रश्नावर मजेशीर उत्तर आले. जेसीबीचे टायर पंक्चर झाले असून ते काढण्यासाठी पालिकेकडून पैसे मिळत नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून जेसीबी एकाच जागी
जेसीबीच्या मोठ्या टायरचे पंक्चर काढण्यासाठी १०० रुपये खर्च होतात. बिल सादर करावे लागत असल्याने पालिकेला यासाठी ५०० रुपये खर्च करावे लागतात. ही परंपराच झाली असली तरी केवळ १०० रुपयांसाठी गेल्या तीन दिवसांपासून जेसीबी एकाच जागी उभे आहे.