औरंगाबाद- गणपतीच्या मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना २० फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास जय विश्वभारती कॉलनीत घडली. याप्रकरणी सुवर्णा राजेंद्र खोंडे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मंदिरातून घरी परतताना दुचाकीवरून आलेल्या तरुणाने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दुचाकीस्वार शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना टार्गेट करत अशा प्रकारच्या चोऱ्या करत आहेत. सातारा, सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटनांची वाढ झाल्याचे दिसून येते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आहेर करत आहेत.