औरंगाबाद - राजकीय वैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या १४ पैकी ९ अारोपींना तब्बल २३ वर्षे चाललेल्या खटल्यात औरंगाबाद खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघे निर्दाेष सुटले तर तीन आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाले अाहे.
बीड जिल्ह्यातील कुंभारी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अविश्वास ठराव मांडल्याप्रकरणी गावातील १४ जणांनी तिघांना बेदम मारहाण केली होती. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल होऊन या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. मुख्य साक्षीदारांची साक्ष उशिरा नोंद झाली; ती विश्वासपात्र नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सर्व १४ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात फिर्यादी सुमंत भालेराव व राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात अपील केले. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने कलम ३०२ अन्वये १४ पैकी ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रकरणात शासनातर्फे सहायक सरकारी वकील सचिन सलगारे, तर फिर्यादी सुमंत भालेराव यांच्यावतीने अॅड. एम.जी. कोळसे यांनी बाजू मांडली. खंडपीठाने दिगंबर सुरवसे आणि मोहन काळे यांची निर्दोष मुक्तता केली. सुनावणी दरम्यान लिंबाजी सुरवसे, गोरख वाघ आणि उद्धव सुरवसे यांचे निधन झाले होते.
काय होते प्रकरण : सरपंचपदाच्या निवडीवेळी आरोपी उद्धव सुरवसे यांच्यावर महावीर सुरवसे यांनी अविश्वास दर्शवला होता. दरम्यान महावीर सुरवसे, सुमंत भालेराव आणि वशिष्ठ वाघमारे हे तिघे बीडहून गावाकडे परतत असताना आरोपींनी त्यांना
एका नाल्याजवळ अडवत काठ्या, कुऱ्हाड आणि तलवारीने मारहाण केली होती. यात महावीर सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला होता.