पैठण- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने वरील धरणातून जायकवाडी प्रकल्पात आवक सुरू होती. मात्र ४८ तासांतच ही आवक घटली अाहे. शनिवारी २३ हजार क्युसेक वेगाने येणारे पाणी आता १८ हजार क्युसेकने दाखल होत असून यामुळे जायकवाडीचा जलसाठा २०.२५ टक्के झाला आहे. दरम्यान, उद्या सोमवारी जायकवाडीच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने वरच्या धरणाांतून गोदावरी नदीपात्रात २३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते. आता हा वेग १८ हजार क्युसेकवर आला अाहे. दारणा धरणातील विसर्गाचा वेग कमी करण्यात आला असून सध्या ७ हजार ३०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. शनिवारी हेच प्रमाण २३ हजार क्युसेक होते. सध्या दारणातून २ हजार, वाकी २ हजार क्युसेकने आवक सुरू आहे. पाऊस थांबल्याने हे प्रमाण आणखी कमी होणार आहे. मात्र या दोन दिवसांत तीन टक्क्यांनी पाणीसाठा वाढल्याने सिंचनासाठी एक पाणी पाळी मिळण्याची आस निर्माण झाली अाहे. मराठवाड्यातील एक लाख हेक्टरवरील शेतीला पाणी देण्याचा निर्णय उद्या घेतला जाण्याची शक्यता आहे.
सिंचनाच्या पाळीचानिर्णय उद्या
सध्या पाण्याची आवक कमी झाली असून वरील भागातील पाऊस थांबल्याने हे पाणी येणेही दोन दिवसांत बंद होईल. मात्र या पाण्याने सिंचनासाठी एक पाणी पाळी मिळण्याचा निर्णय उद्या सोमवारी होण्याची शक्यता आहे.
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग पैठण