आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- एका गुन्ह्यात एफआयआर दाखल झालेला असताना त्याच प्रकरणात दुसरा एफआयआर दाखल करणे कायद्याला धरून नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती एस. बी. देशमुख यांनी दिला.
माजलगाव (जि.बीड) येथील सोहेल कलिमोद्दीन सिद्दिकी व इतर 20 जणांनी खंडपीठात अर्ज केला होता. यात नमूद केले होते की, 26 सप्टेंबर 2011 रोजी शेख एजाज शेख नवाब यांनी सोहेलसह 20 अर्जदारांविरुद्ध भादंविचे कलम 143, 147, 148, 149, 324 व 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील साक्षीदार सय्यद खदीर सय्यद अहमद हेदेखील जखमी झाले होते. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करून चौकशीअंती दोषारोपपत्र दाखल केले. मात्र साक्षीदार सय्यद खदीर यांनी फौजदारी संहिता कलम 156 (3) नुसार प्रथमवर्ग न्यायालय, माजलगाव येथे आरोपींवर त्याच गुन्ह्यामध्ये दुसरा एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
जवळपास एक वर्षानंतर माजलगाव न्यायालयाने दुसरा एफआयआर दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. यावर सर्व आरोपींनी दुसरा एफआयआर रद्द करावा म्हणून अँड. सुदर्शन साळुंके आणि र्शीकांत कवडे यांच्यामार्फत खंडपीठात अर्ज दाखल केला. न्यायालयात आरोपींच्या वतीने एकाच गुन्ह्यात एफआयआर दाखल असताना त्याच गुन्ह्यात दुसरा एफआयआर दाखल होणे कायद्याशी सुसंगत नसल्याने दुसरा एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींवरील दुसरा एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.