आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद टाळण्यासाठी मराठा आरक्षण गरजेचे : संभाजीराजे भोसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण: महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केले. आरक्षणामुळे समाज प्रगत झाला. परंतु आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढूनही आरक्षणाचे वाद कोर्टात जात आहेत. गावपातळीवर जे मराठा इतर समाजांत वाद होतात ते केवळ मराठ्यांना आरक्षण मिळाले नसल्याने होत असून शाहू महाराजांनी जो बहुजनवाद सांगितला, यात मराठा समाज असून हे होणारे वाद टाळण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी पैठण तालुक्यातील कातपूर येथे व्यक्त केले.

पैठण तालुक्यातील कातपूर येथे राज्यातील पहिल्यांदा उभारण्यात आलेल्या मराठा भवनाच्या कोनशिलेचे उद्घाटन खासदार भोसले यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. आमदार संदिपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, दत्ता गोर्डे, विनोद पाटील, साईनाथ सोलाट, संतोष गव्हाणे आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. खासदार भोसले पुढे म्हणाले, मी या ठिकाणी मराठा म्हणून आलो नाही, तर बहुजन म्हणून आलो. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बहुजन एकत्रित केले त्याच धर्तीवर मराठा हादेखील बहुजन असून तो आरक्षणासाठी हक्कदार आहे, मग मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे? संसदेत मराठा आरक्षणावर भाष्य करणारा मी पहिला खासदार आहे. यापुढेदेखील मराठा समाज आरक्षणासाठी पुढे राहणार असल्याचे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
 
 इतर जाती-धर्माच्या आरक्षणाला हात लावता तामिळनाडूप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्या, कोपर्डी हे जरी निमित्त असले तरी हा उद्रेक होता तो औरंगाबादच्या पहिल्या मोर्चाने बाहेर आला. त्यानंतर जे मोर्चा झाले त्याने इतिहास रचल्याचे म्हणाले. अण्णाभाऊ लबडे, संतोष गोबरे, भाऊ लबडे, किरण जाधव, किशोर तावरेसह मराठा बांधव उपस्थित होते.
 
मुंबईच्या मोर्चाची तारीख लवकरच सांगा 
मुंबईतजो शेवटचा मोर्चा निघणार आहे, त्याच्या तारखेचा जो घोळ सुरू आहे तो मिटवा एकदाची तारीख जाहीर करा, असे आवाहन खा. भोसले यांनी मराठा समाज मोर्चाच्या संयोजकांना केले. 
 
देवीचंद मोरे यांनी भवनासाठी दिली जागा 
कातपूर येथील देवीचंद मोरे त्यांचे पुत्र दीपक मोरे यांनी राज्यातील पहिल्याच मराठा भवनासाठी जागा दिली, अशा दानशूर मराठा समाजातील लोकांनी पुढे येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले.