एमआयएम रिंगणात नसल्याने सातारा देवळाईत शिवसेना, भाजपत खरी लढाई असल्याचे आणि सेनाच बाजी मारणार असे चित्र प्रारंभीपासूनच रंगवण्यात आले होते. वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन्हीही वाॅर्डांत एकूण ९५० मतांची आघाडी असल्याने दोन्हीही वाॅर्ड आमचेच असे भाजपचे म्हणणे होते, तरीही त्यांच्याकडून युतीचा प्रयत्न झाला खरा पण सेनेने जुमानले नाही. युती करण्याची त्यांची इच्छा नव्हती, असा प्रकार नव्हे तर सेनेत बोलणी कोणी करायची, उमेदवार कोणी ठरवायचे यावरूनही वाद होते.
अखेरपर्यंतसंशयकल्लोळ : खासदारचंद्रकांत खैरे यांनी जुने शिवसैनिक राधाकृष्ण गायकवाड यांच्या पुतणीलाच उमेदवारी द्यावी, यासाठी हट्ट धरला. परंतु, स्थानिकाला उमेदवारी देण्यात यावी, असे अन्य नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, खैरेंपुढे कोणाचेही काही चालले नाही. म्हणूनच स्थानिक, शहरातील काही कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या थेट विरोधात काम केले. तसाच प्रकार देवळाईतही घडला. हा मतदारसंघ आमदार संजय शिरसाट यांचा. परंतु त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. खैरे, पालकमंत्री रामदास कदम यांच्या जाहीर सभा आपल्या मतदारसंघात होताहेत, याचीही कल्पना शिरसाट यांना नव्हती. अगदी शेवटच्या टप्प्यात खैरे प्रचारात उतरले. संघटनात्मक संकेत डावलून पालकमंत्र्यांनी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली, त्याची नाराजी होतीच. या पार्श्वभूमीवर सेनेचा प्रचार सुरू होताच गायकवाड यांचा पराभव व्हावा, असे सेनेचेच कार्यकर्ते जाहीरपणे बोलत होते. तसाच प्रकार शिरसाट समर्थक हरिभाऊ हिवाळेंच्या बाबतीत देवळाईत सुरू होता. परिसरातील चार मोठ्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे त्यांच्या विरोधात प्रचार केला. सेनेने मतदानाच्या एक दिवस आधी पक्षनिधी दिला. तोही उमेदवाराऐवजी नेत्याच्या मर्जीतील कार्यकर्त्यांकडे सोपवला. त्यांनी तो कमीत कमी कसा खर्च होईल, याची काळजी घेतली. परिणामी सेनेतर्फे अखेरपर्यंत गोंधळ, संशयकल्लोळ होता.
पुढे वाचा, पहिल्याच परीक्षेत तनवाणी उत्तीर्ण, सेनेला धडा : फक्त भावनिक मुद्द्यांवर जिंकणे अशक्य, पाण्यानेच भाजप-काँग्रेसला तारले, शिवसेनेला मारले!