औरंगाबाद - रेल्वे प्रशासनाने १२ नोव्हेंबरपासून नांदेड ते नवी दिल्ली संत निरंकार विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळमार्गे नवी दिल्लीला जाईल. ही गाडी नांदेड येथून सकाळी ११. ५० ही सुटून १३ रोजी रात्री ९.५० वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. १४ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता ती परतीच्या प्रवासाला लागून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, द्वितीय शय्या आणि स्लीपर डब्ब्यांचा समावेश आहे.
गाड्यांचे डबे वाढवले
दिवाळीप्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्यांच्या डब्यात तात्पुरत्या स्वरूपात वाढ केली आहे. सचखंड एक्स्प्रेसमध्ये द्वितीय शय्या श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अमृतसर येथून निघणाऱ्या गाडीमध्ये हा अतिरिक्त डबा जोडला जाईल. तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा तर सिकंदराबाद - शिर्डी - सिकंदराबाद गाडीत एक द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा (ए. सी. टू टायर) डबा वाढवण्यात आला आहे. सिकंदराबाद - शिर्डी - सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये तृतीय श्रेणीचा डबा वाढवण्यात आला आहे. दर रविवारी सिकंदराबाद येथून निघणाऱ्या गाडीमध्ये तर दिनांक २, ९, १६, २३, आणि ३० नोव्हेंबर दर सोमवारी शिर्डी येथून निघणाऱ्या गाडीला हा अतिरिक्त डबा जोडला जाईल. नांदेड - तिरुपती - नांदेड साप्ताहिक गाडीत द्वितीय वातानुकूलित डबा वाढवण्यात आला.