आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- शेवगाव (जि. नगर) तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणेच दर दिला होता. उलट ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता कोल्हापूरप्रमाणे २०० रुपये टनामागे जास्त दिले होते, असा दावा या कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी केला आहे.
या कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत कारखान्याने २५५० रुपये दर मान्य केला. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’शी बाेलताना मुळे म्हणाले, ‘नियमाप्रमाणे एफआरपीमधून ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा करावा लागतो. त्यानुसार आम्ही प्रतिटन ६०९ रुपये वजा केले. हा खर्च ऊस किती अंतरावरून येतो यावर अवलंबून असतो. आमच्या कारखान्याचा उतारा ८.९१ टक्के इतकाच असल्याने एफआरपी १९४१ रुपयेच निघते. त्यात आम्ही २०० रुपये वाढवून शेतकऱ्यांना २१४० रुपये दर देत होतो. मागच्या वर्षी उसाअभावी केवळ ५२ दिवस कारखाना चालला. त्याचा मोठा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. आधीच कारखान्यावर मोठे कर्ज आहे. आता आंदोलनानंतर दर वाढवल्यामुळे आणखी नुकसान होणार आहे, असेही मुळे यांचे म्हणणे आहे. ''
शेतकऱ्यांना ठरल्यापेक्षा जास्तच नफा देऊ
गंगामाई कारखान्यात वीजनिर्मिती होते. डिस्टिलरीही आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाच्या नफ्यातील ७५ टक्के वाटा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आणि २५ टक्के वाटा कारखान्याला मिळतो. बैठकीत ७० : ३० असा फॉर्म्युला ठरला असला तरी आम्ही नियमाप्रमाणे ७५ : २५ असाच देणार आहोत. शिवाय कारखान्यातर्फे परिसरात ९२ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातून १५० कोटी लिटर पाणी साठले आहे. त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होतो आहे. त्याबाबतीतही या शेतकऱ्यांनी कधीतरी कारखान्याला धन्यवाद द्यायला हवेत, अशी अपेक्षा करणे चुकीचे होणार नाही, असेही मुळे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.