औरंगाबाद- इंदूरकडे जाणा-या खासगी ट्रॅव्हलने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच अंत झाला. अपघात एवढा भीषण होता की, युवकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने चेंदामेंदा झाला. ही घटना गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील रत्नप्रभा मोटर्सच्या जुन्या शोरूम समोर घडली. अपघातानंतर चालकाने बस न थांबवता पळ काढला. मात्र महिंद्रा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने पाठलाग केल्याने पोलिसांनी बस ताब्यात घेतली.
औरंगाबादहून इंदूरला जाणारी ट्रॅव्हल (क्र.एमपी 41 पी 1999) बाबा पेट्रोल पंपाला वळसा घालून मनमंदिर ट्रॅव्हल्सकडे जात होती. रत्नप्रभा मोटर्सच्या जुन्या शोरूम समोर क्रांती चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास (क्र. एमएच 21 एफ 9967) ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालवणाऱ्या युवकाच्या डोक्यावरून समोरील चाक गेल्याने चेंदामेदा झाला. रस्त्यावर प्रचंड रक्त सांडले. मेंदूचे काही तुकडे बसच्या मागच्या चाकाला चिकटले गेले. अपघातानंतर चालकाने बस मनमंदिरच्या स्थानकात उभी करून पळ काढला. या बसमध्ये प्रवासी होते. अपघातानंतर महिंद्र फायनान्स कंपनीत काम करणारे भगवान ठाकूर यांनी बसचा पाठलाग केला आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलिस वसंत जिवडे, अजय भालेराव, एस. बी काळे यांनी मनमंदिरच्या स्थानकात बसची तपासणी केली. तेथे चार ते पाच बस उभ्या होत्या. तेव्हा एका बसच्या मागच्या चाकाला मेंदूचे तुकडे चिकटलेले दिसले, तर समोरील चाक रक्ताने माखले होते. यावरून पोलिसांनी ती बस ताब्यात घेतली. बस इंदूर येथील धारीवाल ट्रॅव्हल्सच्या मालकीची असल्याचे समोर आले. दरम्यान, मृतदेह घाटीत दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नाही. त्याच्याजवळ बॅग व स्वयंपाकाची भांडी होती.
ओळख पटवण्याचे काम सुरू
हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असून दोन्ही बाजूने सुसाट वेगाने वाहने धावतात. अपघातानंतर कुणीही थांबण्यास तयार नव्हते. अपघात झाला तेव्हा कोणालाही काही कळले नाही. धडक दिल्यानंतर दुचाकी चालक युवक बसच्या खाली फेकला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या मृत युवकासोबत अजून एक जण होता. बसच्या धडकेत तो डाव्या बाजूला फेकला गेला.