औरंगाबाद- गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन जणांचे प्राण पडेगाव येथील अशोक पठाडे आणि मिलिंद गातेगावकर यांनी वाचवले.
दौलताबादजवळील मोमबत्ता तलावात ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अशोक एकनाथ दांडगे (२२, रा. दौलताबाद) आणि प्रमोद विशाल गवळी (१९) हे दोघे गणपती विसर्जनासाठी गेले होते. मात्र, प्रमोदचा पाय घसरून पडल्यामुळे तो पाण्यात पडला. त्याच वेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अशोकदेखील पाण्यात गटांगळ्या खात होता; पण पडेगावमधील शविशक्ती गणेश मंडळाचे अशोक व मिलिंद विसर्जनासाठी तलावाजवळ आले. तेव्हा "वाचवा, वाचवा' असा आवाज आला. तलावात दोघे तरुण बुडत असल्याचे पाहून अशोक व मिलिंदने पाण्यात उडी टाकली व दोघांना वाचवले. अशोक ऑर्केस्ट्रात गायनाचे काम करतो, तर मिलींद ड्रायव्हर आहे.
वाळूज, गेवराईत दोघांचा बुडून मृत्यू
दोन विविध घटनांमध्ये विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. पैठण रोडवरील गेवराई येथील विहिरीजवळ सायंकाळी ६ वाजता विसर्जन सुरू असताना मूळ जामखेड (ता. अंबड) येथील दगडू मोघाजी भोजन (४०) यांचा पाय घसरला व ते विहिरीत पडले. सुनील चव्हाण यांनी त्यांना घाटीत दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसरी घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. घरातील गणेशमूर्तीचे वडगाव कोल्हाटी पाझर तलावात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या संपत विठ्ठल सोनवणे (२१, रा. वडगाव कोल्हाटी) याचा सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास बुडून अंत झाला.