आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - जुलै महिन्यात होणार्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण, याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून सुरू असली तरी प्रत्यक्षात आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच उमेदवार निश्चित होणार असल्याचे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. त्याआधी उमेदवार निश्चित करण्याचे ठरलेच तर लोकसभा निवडणुकीत पक्षाला फायदा व्हावा असा निर्णय झाला तर लोकसभेबरोबरच तो जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. गतवेळी त्यांच्याकडून पराभूत झालेले भाजपचे श्रीकांत जोशी यांनी या वेळी लढण्यास नकार दिल्याने उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून बाहेरचा उमेदवार आयात करण्याचाही प्रयत्न झाला. अजित मुळे, उद्योगपती राम भोगले यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र दोघांकडूनही नकार आल्याने उमेदवार निश्चिती तशीच राहिली.
पक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतरच पदवीधरचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. लोकसभेत जनाधार काय म्हणतो यावर उमेदवार ठरवला जाऊ शकतो. नेत्यांना आवश्यकता वाटल्यास लोकसभेच्या उमेदवारांबरोबरच निवड जाहीर होऊ शकते.
का होते घाई ? मराठवाडा हा मोठा भौगोलिक प्रदेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांत फिरण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. मतदार नोंदणी केव्हाच पूर्ण झालेली आहे. त्यात चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे आतातरी उमेदवारी जाहीर झाली म्हणजे कुरबुरी संपवण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधणे सोपे जाऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.