औरंगाबाद - औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून शहरात पाणी मीटर बसवले जात आहेत. मात्र, मीटर बसवल्यानंतर अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मीटर बसवण्याची मोहीम सुरू असल्याने हा प्रकार होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. वास्तविक, मीटर बसवण्याचा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा संबंध काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे यासाठी नळांना मीटर बसवण्यात येत आहेत. नागरिकांना ३६२१ रुपयांचे मागणीपत्रही दिले जात आहे. दुसरीकडे मीटरमुळे नळाला अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. अनेकांना दोन-तीन हंडे पाणी मिळणेही मुश्कील आहे.
पैसे भरण्याचे आदेश
आमच्या भागात काही नळांनाच मीटर बसवले. हजार ६२१ रुपयांची पावती देऊन पैसे कार्यालयात भरण्याचे आदेश दिले. के.व्ही. जॉन, रहिवासी
किती युनिटला किती बिल? मीटरची स्पीड कशी, याबाबत कोणतीच माहिती नाही. पाणी देण्यापूर्वीच मीटर बसवण्याची घाई केली. प्रा.डी. एस. गजहंस, रहिवासी
पाण्याचा दाब कमी
मीटर बसवण्यापूर्वी मुबलक पाणी येत होते. आता मात्र अत्यंत कमी पाणी येत असून त्याचा दाबही जेमतेम असतो. पाणी तर येत नाही, मीटर मात्र जोरात फिरत आहे. संदीपभिवसने, रहिवासी
या भागात आला अनुभव
एन-२ भागातील एएच सेक्टर भागात २८ एप्रिल रोजी पाणी मीटर बसवल्यानंतर ३० एप्रिलला पाणी आले; मात्र केवळ ६०० लिटर पाणी मिळाले. याच भागातील भिवसने यांच्या परिवारात आठ व्यक्ती आहेत. प्रतिव्यक्ती दररोज १२० लिटर पाणी या निकषानुसार आठ जणांना दिवसाला साधारणत: एक हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, दोन दिवसांआड पाणी येत असल्याने एका व्यक्तीला ९६० लिटर पाण्याची गरज आहे. येथे तर आठ जणांना ६०० लिटर पाणी मिळत आहे.