औरंगाबाद: राज्यातील जि. प.च्या १०० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले अाहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’अंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी १४ ते २१ जानेवारी या कालावधीत केम्ब्रिज तज्ज्ञांची एक समिती महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासासाठी भेट देणार आहे. या समितीचे सदस्य अबिगेल बर्नेट त्यांच्यासह दोन संपर्क अधिकारी १७ जानेवारीला शहरात येतील.
गरिबांच्या शाळा म्हणून सरकारी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पाहिले जाते. या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, अशी ओरड नेहमीच होत असते. या सर्व चर्चा फोल ठरवत शाळांमधील गुणवत्तावाढीच्या दृष्टिकोनातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्यात ज्ञानरचनावाद, शिक्षकांना प्रशिक्षण आदी उपक्रम आहेत.
या उपक्रमांमुळे नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल सरस, अशी प्रतिमा काही शाळांनी तयार केली आहे. अनेक शाळा स्वयंपूर्ण झाल्या आहेत. आता या शाळांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांच्या स्पर्धेत उतरावे, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केम्ब्रिजमधील तज्ज्ञांची समिती सहकार्य करणार आहे.
१७ जानेवारीपासून ही समिती तपासणीसाठी येईल. चर्चेसाठी दिलेल्या वेळेत मुख्याध्यापक, निवडक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्यक माहितीसह उपस्थित राहावे, असे आदेश विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक पुष्पलता पवार यांनी दिले आहेत.