आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखिका साहित्य संमेलन; चौथ्या संमेलनानंतर बीडकरांना आता आठव्या संमेलनाचा मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- येथील अहिल्यादेवी होळकर महिला प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनास  शनिवारपासून (दि. २०)  सुरुवात होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता बीड शहरातून ग्रंथदिंडी निघणार  असून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी १० वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते  उद््घाटन होणार आहे.चौथ्या संमेलनानंतर  बीडकरांना  आता आठव्या संमेलनाचा मान मिळाला आहे.  


साहित्य, संस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेल्या बीडमध्ये २० व २१ जानेवारी २०१८ रोजी ८ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांची निवड करण्यात आलेली अाहे.  शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील माळीवेसहून ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. ही ग्रंंथदिंडी बलभीम चौक, बशीरगंज, शिवाजी महाराज पुतळा मार्गे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दाखल होईल. ७ व्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते सकाळी पावणेदहा वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, आ. अमरसिंह पंडित, प्रकाशक सुमती लांडे व साहित्यिक दिशा शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  शिवसंग्रामचे आमदार  विनायक मेटे, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, प्रकाश सोळंके, माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, प्रा. सुनील धांडे, आदिनाथ नवले, जनार्दन तुपे, सिराज देशमुख, बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, अक्षय मुंदडा आदी उपस्थित राहणार असून याप्रसंगी संध्या बारगजे, मयूरी राजहंस, अस्मिता जावळे, कावेरी नागरगोजे, प्रिती गर्जे, शांताबाई काळे, रीता जाधव, सृष्टी सोनवणे व पद्मिनी पुरी यांचा विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल विशेष सत्कार होणार आहे.  


संमेलनास महिला व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्षा अॅड. उषा दराडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे, बीड शाखेचे प्रमुख डॉ. सतीश साळुंके, प्रेमलता चांदणे, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, विमल ठोंबरे, अॅड. पुष्पा कदम, अॅड. ज्योती कासट, प्राचार्या डॉ. कांचन शृंगारपुरे, डॉ. राजश्री तावरे, अॅड. मंजूषा दराडे, माया दिवाण, प्रतिभा गणोरकर, सुलोचना वारे, शालिनी परदेशी यांनी केले आहे. 

पहिल्या दिवशी संमेलनात काय ? 
दुपारी २ ते ४ या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन श्रद्धा बेलसरे -खारकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.  दुपारी ४ ते ६ या वेळेत ‘स्त्री सक्षमीकरणाचा लढा जागतिक आणि भारतीय’ या विषयावर परिसंवाद होईल. ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. सुशीला मोराळे अध्यक्षस्थानी राहतील. प्राचार्या सविता शेटे, आशा भिसे, योगिता होके, वैशाली सावंत, मेघना मनगटे, सुनीता चावला या सहभाग नोंदवणार आहेत. रात्री साडेसात ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. 

 

पुस्तक प्रकाशन सोहळा 
संमेलनाच्या उदघाटनानंतर ‘उष:काल’ या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. सोबतच  प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या ‘शब्द सागर, अक्षर जागर’, ‘संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांच्या मधुराभक्ती’ व ‘दीपार्थ गौरव (डॉ. दासू वैद्य संपादित) या ग्रंथाचे  प्रकाशन होईल. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा माजी आ. अॅड. उषा दराडे लिखित ‘घायाळ दंश’ या ग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे.  

 

चौथ्यानंतर आता आठव्या संमेलनाचा मान  

बीड शहरात चौथे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले होते. आता आठवे साहित्य संमेलनाचा मान  बीडकरांना मिळाला असल्याने या संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शहरात दोन दिवस साहित्यिकांची मांदियाळी राहणार  असून शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.  

बातम्या आणखी आहेत...