अंबाजोगाई - चारित्र्यावर संशय घेत नणंदेच्या मुलीच्या विवाहासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत छळ केल्याने विवाहितेने तीन मुलांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना मुकुंदराज कॉलनीत शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसांनी तिच्या माजी सैनिक पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मुकुंदराज कॉलनीत मृत विवाहिता शेख नूरजहाँ हिचे वडील शब्बीर खान महेबूब खान (रा. भोईगल्ली, परळी) यांनी परळी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नूरजहाँचा पती शेख फतरू ऊर्फ बाबू शेख रज्जाक, नणंद शेख बीबी शेख लाला (रा. धायगुडा पिंपळा), दुसरी नणंद अमिता जैनोद्दीन पठाण (रा. खाडगाव, लातूर), नंदावा जैनोद्दीन हुसेन खान पठाण यांनी शेख नूरजहाँच्या चारित्र्याचा संशय घेतला. नणंद अमिता पठाणच्या मुलीच्या विवाहासाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास दिला. शेख फतरू हा बाहेरख्याली वर्तनाचा होता. त्याच्या या वागण्यास कंटाळून नूरजहाँने मुलगी नेहा (१४), तोहीत (९), अफहाण (४) यांना विष देऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर तिनेही गळफास घेतला.
मला आणि मुलांना मारत होता
आत्महत्या करण्यापूर्वी नूरजहाँने लिहिलेल्या चिठ्ठीत तीन मुलांना मारलंय. पती व्याभिचारी असून बाहेरख्याली आहे हे. दारू पिऊन मला व मुलांना सतत मारहाण करत होता. यास कंटाळून तीन मुलांना मारत मी स्वत: आत्महत्या करत असल्याचे नूरजहाँने चिठ्ठीत म्हटले आहे.