बीड - मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, हा कलंक पुसत बीड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थांनी सलग पाचव्यांदा मराठवाड्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.
मराठवाड्यात १ जानेवारी २०१७ ते २८ मे २०१७ पर्यत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने खचलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले असले तरी याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मात्र परिस्थितीशी दोन हात करून गुणवत्तेची परंपरा कायम राखून शिक्षणात ‘बीड पॅटर्न’चा दबदबा निर्माण केला आहे.
दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा ९२.६५ टक्के निकाल लागला असून मराठवाड्यात जिल्हा पहिला आला आहे. जिल्ह्यात यंदा ४२ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार ३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेला अंबाजोगाई तालुका जिल्ह्यात आठव्या स्थानावर गेला आहे. जिल्ह्यात २५३१३ मुले व १७१३० मुली अशा एकूण ४२४४३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी २२९८४ मुले, तर १६३४० मुली दहावीत उत्तीर्ण झाल्या. मुला-मुलींची एकूण उत्तीर्ण संख्या ३९३२४ इतकी आहे. बीड जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.३९ टक्के असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ९०.८० टक्के इतकी आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.६५ टक्के इतका लागला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा... लातूर, हिंगोल, परभणी आणि नांदेडचा निकाल...