जालना- भरचौकात एकट्याला गाठून चौघा मारेकर्यांनी तलवारीचे 18 वार करत खून केला. ही खळबळजनक घटना जालना शहरातील राजूर रोडवरील हनुमान चौकात मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली. गोपाल गोवर्धन शर्मा (56, शिक्षक कॉलनी, नवीन मोंढा रोड, जालना) असे मृताचे नाव आहे.
गोपाल शर्मा व त्याचा मुलगा आकाश दोघे मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हनुमान चौकात थांबले होते. साहित्य घरी ठेवण्यासाठी आकाश शिक्षक कॉलनीतील घरी गेला. दहा मिनिटांनी परतल्यावर वडील गोपाल शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याच्या निदर्शनास आले. वडिलांना रुग्णालयात
नेण्यासाठी रस्त्यावरून जाणार्या प्रत्येक वाहनचालकाकडे आकाश विनवणी करत होता. मात्र, कुणीही घटनास्थळी न थांबता भरधाव पुढे जात होते. ही माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी सामान्य रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोपाल शर्मा यांच्यावर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
घरमालकावर संशय
गोपाल शर्माचा खून घरमालक गोपाल नारायण अवधूत याच्यासह अन्य तिघांनी केल्याचा संशय आकाश व त्याच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे. त्यानुसार आरोपी पकडण्यासाठी विशेष कृती दलाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत उबाळे यांचे पथक रवाना झाले आहे.