उमरगा- केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र यांचे सरकार स्थापन झाल्यापासून जनतेला दारिद्र्य सहन करण्याची वेळ आली आहे. मोठ्या अपेक्षेने भाजप – सेनेला जनतेने निवडून दिले असताना मोठा अपेक्षाभंग झाला आहे. सरकारला सामान्य जनतेशी काहीही देणे-घेणे नाही. भावना नसलेलं सरकार म्हणून यांची ओळख झालेली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ येणेगूर येथे शनिवारी झाला. या वेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, बसवराज पाटील, अशोकराव निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील आदींची उपस्थिती होती.
जाणीवपूर्वक सर्जिकल स्ट्राइक
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, निवडणुका तोंडावर आल्याचे पाहून या सरकारने जाणीवपूर्वक सर्जिकल स्ट्राइक करून त्याचे भांडवल केले. काँग्रेसने सरकार असताना २००३ ते २०१३ मध्ये तीन वेळा अशी कारवाई केली आहे. मात्र, याची गुप्तता पाळली होती. नोटाबंदीचा चुकीचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनी तेव्हाच नोटा बदलून घेतल्या. काँग्रेसने विदेशातील बँकांकडून काळा पैसा काढण्यासाठी प्रयत्न केले.