धारूर - सात फेरे घेऊन सात जन्माच्या सोबतीचे वचन देण्यापूर्वीच वधूला फिरायला घेऊन गेेलेल्या वराने तिचा खून केल्याची घटना धारूर घाटात बुधवारी उघडकीस आली. घाटातील झुडपांच्या जाळीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, फिरायला सोबत येताना तरुणीने उंदीर मारण्याच्या पुड्या आणल्या होत्या, असे तरुणाने पोलिसांना सांगितले आहे.
माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील सोनाली ऊर्फ रिंकू मोतीराम नाईकनवरे (१७) या तरुणीचा गावातील प्रशांत खराडे (२२) या तरुणाबरोबर दोन महिन्यांपूर्वी विवाह जुळला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम होऊन २ फेब्रुवारी रोजी विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. दोघांकडून मात्र एकमेकांच्या पसंतीबाबत शंका व्यक्त केली जात होती. विवाह जुळल्याने प्रशांतने सोनालीला मोबाइल गिफ्ट दिला होता. सोमवार, ९ जानेवारी रोजी दुपारी आजीबरोबर तरुणी माजलगाव येथे आली होती. तेव्हा प्रशांतने सोनालीला महत्त्वाचे बोलायचे आहे, असे म्हणून दुचाकीवरून तेलगावला नेले. तेलगाव - धारूर मार्गावर एका ठिकाणी चहा घेऊन दोघे धारूरकडे गेले. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बन्सीवाडी येथे त्यांनी काही वेळ घालवला. दोघांच्या चर्चेत सोनालीने माझ्या घरची परिस्थिती बिकट असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे प्रशांतला सांगितले. त्यानंतर बोलत दोघे झाडांच्या जाळीत गेले. तेव्हा प्रशांतने सोनालीचा खून करून धूम ठोकली. रात्र झाली तरी मुलगी सोनाली घरी न आल्याने ितचे वडील मोतीराम नाईकनवरे यांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून प्रशांतवर सोनालीला पळवून नेल्याचा गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी प्रशांतला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
खाक्या दाखवताच मृतदेह दाखवला
सोनाली बेपत्ता झाल्याने पोलिसांचा संशय प्रशांतवर बळावला. पोलिसांनी मंगळवारी प्रशांतला चौकशीसाठी ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. प्रशांतच्या सांगण्यावरून पोलिस माग काढत थेट धारूरच्या घाटात पोहोचले. बुधवारी दुपारी मुलीचा मृतदेह आढळून आला.