नगर - पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढलेले मृतदेह
आपल्या काका-काकूंचे असल्याचे आरोपी प्रशांत जाधव यानेच ओळखले होते. विहिरीतून काढलेले शिरविरहित धड आपला चुलतभाऊ सुनील याचे असल्याचे प्रशांतने ओळखले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष पंच आत्माराम घाटूळ यांनी साेमवारी न्यायालयात दिली. बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याची नियमित सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाली. त्यात घाटूळ यांची साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली.
जवखेडे खालसा येथील शेतावर असलेल्या विहिरीतून तीन मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले होती. त्या वेळी आत्माराम घाटूळ हे पंच म्हणून उपस्थित होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी त्यांची सरतपासणी घेतली.
‘२१ ऑक्टोबर २०१४ रोजी आपण पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे घटनास्थळी पोहोचलो. पोलिसांनी आपल्याला पंच म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. आपल्यासमक्ष पोलिसांनी विहिरीतून तीन मृतदेह बाहेर काढले. सुरुवातीला संजय जगन्नाथ जाधव, त्यापाठोपाठ जयश्री संजय जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. नंतर शिर नसलेले एक धड बाहेर काढले. पोलिसांनी विहिरीबाहेर काढलेले आधीचे दोन मृतदेह आपल्या काका-काकूंचे असल्याचे प्रशांत जाधवने सांगितले. शिर नसलेल्या धडाची ओळखही प्रशांतनेच करून दिली,’ असे घाटूळ यांनी सांगितले. पंचनामा केल्याची वेळही घाटूळ यांनी अचूक सांगितली. मृत संजय जाधव याच्या शरीरावर असलेल्या जखमांचे व कपड्यांचे वर्णनही त्यांनी अचूक केले. न्यायालयात हे कपडे दाखवण्यात आल्यानंतर घाटूळ यांनी ते ओळखले.
आरोपी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव व दिलीप जगन्नाथ जाधव यांच्या वतीने अॅड. पी. एस. गवळी, एस. एस. प्रधान व सुनील मगरे यांनी घाटूळ यांची उलटतपासणी घेतली. पंचनामा करताना तेथे उजेड होता का, घटनास्थळी किती पोलिस होते, असे प्रश्न त्यांनी विचारले. मात्र त्याचा खटल्याशी संदर्भ नसल्याचा आरोप करत विशेष सरकारी वकिलांनी बहुतांश प्रश्नांवर आक्षेप नोंदवला. घाटूळ यांची उलटतपासणीही झाली.
आरोपींतर्फे पुन्हा अर्ज : अटक केल्यापासून तिन्ही आरोपींच्या वतीने वारंवार न्यायालयात अर्ज सादर केले जात आहेत. सोमवारीही आरोपींच्या वतीने दोन अर्ज सादर करण्यात आले. आरोपीच्या वकिलांना घटनास्थळी भेट द्यायची असून आरोपींनाही सोबत न्यायचे आहे. त्यासाठी न्यायालयाकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. न्यायालयाने त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागवले असून मंगळवारी अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
तब्बल १६० साक्षीदार
जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याच्या सुनावणीला दोन वर्षांनंतर वेग आला. चार दिवस या खटल्याचे कामकाज चालणार आहे. या खटल्यात सुरुवातीला दोनशेहून अधिक साक्षीदार होते. त्यापैकी १६० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या जातील. मंगळवारपासून इतर पंचांच्या साक्षी नोंदवल्या जातील. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक जोपळे, सहायक निरीक्षक सचिन जाधव, पंच कपिल तळेकर यांचा समावेश अाहे.