नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षांची देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेली नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर या कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्स कंपनीकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. आमदार अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ही घोषणा केली.
देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा व छोट्या शहरांना मोठ्या शहरासी विमानसेवेने जोडता यावे यासाठी केंद्र शासनाने उडान नावाची महत्त्वकांक्षी योजना घोषित केली. या योजनेअंतर्गत नांदेड-मुंबई व नांदेड-हैदराबाद विमानसेवेची घोषणा झाली. या घोषणेनुसार नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू सुध्दा झाली. परंतु नांदेड-मुंबई विमानसेवा मात्र अद्याप सुरू नाही. विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागरी उड्यन मंत्री गजपती राजू यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी केली व पत्र व्यवहारही केला होता.