चापानेर - कधी शस्त्रांचा धाक दाखवून, तर कधी बेदम मारहाण करून चोरी करण्याचे प्रकार परिचयाचे आहेत, परंतु कन्नड तालुक्यातील चापानेर येथे चोरट्यांनी शेतातील घराबाहेर झोपलेल्या शेतकर्यांच्या अंगावर गुंगीचे रसायन फवारून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे शेतकरी धास्तावले असून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
रविवारी पहाटे चोरट्यांनी शेतवस्तीवरील झोपलेल्या शेतकर्यांच्या चेहर्यावर गुंगीचे रसायन फवारले. शेतकरी व महिला बेशुद्ध पडल्याची खात्री झाल्यानंतर चोरट्यांनी शांतपणे महिलांच्या अंगावरील दागिने काढले. राजेंद्र केशरचंद पांडे यांच्या शेतात ठोक्याने शेती करणारे विलास शंकर हिलाले हे 20 वर्षांपासून कुटुंबीयांसह शेतात वास्तव्यास आहेत. चोरट्यांनी त्यांच्या घरातील पेट्या उचलून काही अंतरावर नेऊन त्यातील दागिने लंपास चोरले. यानंतर चोरट्यांनी रामहरी कारभारी पवार यांच्या वस्तीकडे मोर्चा वळवला. तेथे झोपलेल्या कुटुंबीयांवर रसायन फवारले पाकिटातील तीन हजार रुपये, लाख रुपयांचे सोने चोरले. चोरट्यांनी येथे झोपलेल्या कुत्र्यावरही बेशुद्ध केले. सकाळी उशिरा जाग आल्यानंतर चोरी झाल्याचे कळले व सर्वच अवाक् झाले. कन्नड पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.