नांदेड - मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यांत बुधवार, १४ जून रोजी मध्यरात्रीपासून पुढील ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या या इशाऱ्यात १५ जूनपासून पुढे ४८ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी ७० ते ११० मिमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. पशुधनासह विविध बाबींबाबत काळजी घ्यावी. जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनाही सतर्क करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.