आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जालना - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी सीईओ बी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिकवर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर 1 ऑगस्टपासून जिल्ह्यातील 6 केंद्रांमधील 94 शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीवर थेट सीईओंची नजर राहणार आहे. या उपक्रमामुळे गळतीला ब्रेक लागण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी शासनाकडून सर्वशिक्षा अभियान, निरंतर शिक्षण कार्यक्रम, वस्तीशाळांसारख्या योजना राबवून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असते. मात्र, पुढच्या वर्गापासून गळतीला सुरुवात होते. इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्केसुद्धा उपस्थिती सातवीपर्यंत राहत नाही. अर्थात, प्राथमिक शिक्षणातच गळतीची घरघर सुरू होते. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे अनेक पालक सुटीच्या दिवशी व दुपारनंतर मुलांना शेतात कामावर नेतात.
मुले शाळेत येत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांची गळती ही गंभीर समस्या असून यावर मात करणे आव्हान ठरू लागले होते. जालना जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून ओळखला जातो. यातही ग्रामीण भागात याचा आलेख वाढत आहे. मराठवाड्यातून निरंतर शिक्षण कार्यकमासाठी जालना जिल्ह्याची निवड करणे ही याचीच पावती होय.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विविध पथदर्शी प्रयोग केले जात आहे. शिक्षकांनी मुख्यालयी राहावे, शाळेत वेळेवर यावे यासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक बसवण्यात आले. याच धर्तीवर विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचे शिक्षकांसह पालकांकडून स्वागत होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.