बीड - सततच्या नापिकीला कंटाळून एका ३२ वर्षीय तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील कानडी माळी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.
सहदेव भिमराव राऊत (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. राऊत यांच्या नावावर वीस गुंठे तर वडीलांच्या नावावर साडेसात एकर शेती आहे. दुष्काळाने मागील चार वर्षांपासून शेतीतून पुरेसे उत्पन्न निघत नसल्याने हे कुटूंब आर्थिक विंवचनेत सापडले होते. यामुळे सहदेव चिंताग्रस्त बनले होते. मंगळवारी कुटूंबातील सर्व सदस्य घाटनांदुरला नातेवाईकाच्या लग्नाला गेले असताना सहदेव एकटेच शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.
त्याच दिवशी रात्री उशीरा त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी वडील शेतात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सहदेव राऊत यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्याचा मुलगा, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.