मुंबई - राष्ट्रपती राजवट संपून नवीन सरकार आले तरी आघाडी सरकारच्या ४१ पैकी २२ मंत्र्यानी सरकारी बंगले अद्याप रिकामे केलेले नाहीत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील जन माहिती अधिकारी यांनी गलगली यांना माहिती अधिकारात मंत्र्यांच्या घराची माहिती मागितली होती. राज्यात ४१ मंत्री होते. त्यातील केवळ १९ मंत्र्यानीच सरकारी बंगले खाली केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अजित पवार, नारायण राणे, छगन भुजबल, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम असे २२ मंत्री आहेत.ज्यांनी अद्याप सरकारी बंगला सोडलेला नाही.
सरकारी नियम असा आहे की, मंत्रिपद जाताच बंगला सोडणे अनिवार्य असते. मंत्रिपदावरून मुक्त होताच पहिले १५ दिवस सर्व सुविधा विनामूल्य असते. शासनाच्या परवानगीनंतर पुढील महिने राहिल्यास २५ रुपये प्रति चौरस फूट दर आहे. त्यानंतर शासनाच्या परवानगीने राहिल्यास ५० रुपये प्रति चौरस फूट भाडे आकारण्यात येते, असा नियम आहे.
शपथविधी दिवशी 'वर्षा' सोडला
"मिस्टर क्लीन'अशी प्रतिमा असलेले आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३१ ऑक्टोबरच्या रात्रीच म्हणजे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होता त्या रात्रीच मुख्यमंत्र्यांचा "वर्षा' बंगला खाली केला.
बंगला न सोडणारे मंत्री
अजित पवार , छगन भुजबळ, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, अनिल देशमुख, जयदत्त क्षीरसागर, मनोहर नाईक, डॉ. अब्दुल सत्तार , डॉ. जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, दिलीप सोपल, राजेश टोपे, नसीम खान, हसन मुश्रीफ़, संजय देवतळे, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय सावकारे, सतेज पाटील, डी. पी. सावंत.