मुंबई- मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला असो की वारंवार होणारे बॉम्बस्फोट असो यावर प्रभावी उपायोजना म्हणून मुंबई व परिसरातील महत्त्वाच्या 5000 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार आहेत. फडणवीस सरकारने यासाठी 600 कोटींवरून आता 1100 कोटी रूपयांची निविदा मंजूर करण्यास हिरवा कंदिल दिला आहे.
मुंबईवरील 26/11 हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा हल्ला झाल्यानंतर वर्षभरातच मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्त्कालीन राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र, त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. मुंबई शहरातील अंतर्गत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असले तरी मुंबईचे समुद्रकिनारे आजही सुरक्षित नसल्याचे ताज्या 'मॉकड्रिल ऑपरेशन'मधून स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तापरिवर्तन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत सीसीटीव्ही कॅमे-याचा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईतील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. कॅमेरे बसविण्यासाठी संवेदनशील ठिकाणे ठरविण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांवर जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार कॅमेरे बसविण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. गर्दीची ठिकाणे, वाहतूक कोंडीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे व मंदिरे, रेल्वे स्थानके, बस स्थानके अशा ठिकाणी प्राधान्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
पुढे आणखी वाचा, मुंबई सुरक्षेत कुठे-कुठे व कशा आहेत त्रुटी...