आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे. ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली. तसेच, याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला.
“मोदीमुक्त भारत करण्याआधी महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेला आहे. पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत? यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत.”, अशी टीका आमदार अतुल भातखळकरांनी राज ठाकरेंवर केली. ज्यांनी नगरसेवक पळवले, त्यांच्यावर टीका नाही. पण भारत मोदीमुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे, असेही भातखळकर म्हणाले.
''भारताला 1947 साली पहिले स्वातंत्र्य मिळाले, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळाले आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवले आहे. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.