आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रेशन दुकानदार सरकारी यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहेत. मात्र, सरकारने ‘बायोमेट्रिक’साठी लगेच सक्ती न करता त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जर रेशन दुकानदार अधिक काळासाठी संपावर गेले; तर बीपीएल, एपीएल धारकांना रेशन मिळण्याची पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या मागण्याकडे संवेदनशील भूमिकेतून बघावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून केली.
रेशन दुकानदार आझाद मैदानात आंदोलनाला बसले असल्याने त्यांच्या मागण्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. सोमवारी राज्यातील रेशन दुकानदार मोर्चासाठी आझाद मैदानावर आले आहेत. रेशन दुकानदारांच्या अडचणी समजून न घेतल्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक झालेले नाहीत. एपीएल, बीपीएल कार्ड धारकांची नोंद सर्व्हरमध्ये झालेली नाही. अशा गोष्टींमुळे रेशन दुकानदारांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत, असे ते म्हणाले.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला आणि विषय गंभीर असल्यामुळे इतर आयुधाखाली या संदर्भात चर्चा उपस्थित करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, इतर एका विषयावर बोलताना मुंडे यांनी आजच्या दादर येथील रेले रोको आंदोलनावर मत मांडले. आज सकाळी दादर येथे झालेल्या रेल्वे अॅप्रेंटिशिप विद्यार्थ्यांचे झालेले आंदोलन हे सरकारच्या ‘इंटेलिजन्स’चे अपयश आहे. हा विषय जरी रेल्वे मंत्रालयाशी निगडीत असला, तरी मुंबईची जनता या आंदोलनामुळे वेठीस धरली गेली. हे दुर्दैवी आहे. सरकारच्या गृहविभागाचे हे अपयश असून सरकारने सभागृहात याबद्दल निवेदन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.