आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढील सोमवारी (23 एप्रिल) रोजी नाणार येथील प्रकल्पस्थळी भेट देणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नाणार येथे सरपंच, स्थानिक शेतकरी, मच्छीमारांचे प्रतिनिधी, प्रकल्पविरोधी समिती आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील व त्यांच्या भावना लक्षात घेतील.
नाणार येथील प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाच्या विरोधात राज्यात सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. हा प्रकल्प कोकणात नको अशी भूमिका घेत शिवसेनेने याला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, सर्वच पक्षाचे प्रमुख नाणार येथे जाऊन स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष 10 मे रोजी नाणार प्रकल्पस्थळी जाऊन स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. सोबतच प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ येत्या 20 एप्रिलला नाणार येथे भेट देणार आहे. राज ठाकरे सुद्धा 1 मे पासून महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. या राजव्यापी दौ-यादरम्यान ते नाणार येथे जाऊन स्थानिक, मच्छीमार व शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. राज ठाकरेंच्या नाणार दौ-याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. मात्र, येत्या चार- पाच दिवसात त्यांच्या राज्यव्यापी दौ-याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यावेळी ते स्पष्ट होईल.
दरम्यान, नाणार प्रकल्पापासून कोणतेही नुकसान नाही. कोकणातील शेती, आंबे आदीवर प्रदुषणाचा परिणाम होईल हा गैरसमज पसरविला जात आहे. रिफायनरी प्रकल्पापासून कसलाही धोका नाही. गेल्या 50 वर्षापासून मुंबईतील चेंबूरसारख्या गर्दीच्या भागात तेल शुद्धीकरण रिफायनरीचे काम सुरू आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीबाबतचा गैरसमज पसरविण्याचे काम थांबवावे. या प्रकल्पाला असाच वाढता विरोध झाला तर हा प्रकल्प गुजरातला जाईल. गुजरातने यापूर्वीच अराम्को कंपनीला निमंत्रण दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.