आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ- येत्या संक्रांतीपूर्वी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार कोसळणार असे भाकीत भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शनिवारी यवतमाळमध्ये केले. शेतकऱ्यांच्याआत्महत्या पूर्वीच्या तुलनेत वाढल्या. पिकांचे मातीमोल भाव, शेतकरी जनसामान्यांच्या प्रश्नाकडे केंद्र राज्य शासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष आणि सत्तापक्षाचा खासदार असूनही याबाबत काहीही करू शकत नसल्याचे शल्य बोचत असल्याने खासदारकीचा राजीनामा दिला. आपल्याला निवडून देणाऱ्या जनतेच्या प्रश्नांपुढे खासदारकी महत्वाची नसल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
यवतमाळ येथे शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी त्यांचा रुमणे देऊन सत्कार करण्यात आला. येथील वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयाच्या श्रोतृगृहात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्यावतीने आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते. प्रमुख पाहुणे शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार, पॅन इंडीयाचे अध्यक्ष नरसिम्हा रेड्डी आदी उपस्थित होते.
समाजातील कोणताच घटक या सरकारपासून समाधानी नाही. निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन या फसव्या सरकारने पुर्ण केले नाही. संविधानाशी छेडछाड करून जीएसटी आणून व्यापारीवर्गाचे कंबरडे मोडले. बहुजनांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव वर्तमान सरकारचा आहे. त्यांना देशातील लोकशाहीच संपवायची आहे असा घणाघाती आरोप पटोले यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पटोले यांनी घणाघाती आरोप केले आहेत. मोदी यांच्या वर्तणुकीचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, मोदी हे सतत रेटून खोटे बोलणारे आहेत. शेतकरी, बहुजन समाज व दुर्लक्षित घटकांना ते सतत खोटी आश्वासने देत असतात. त्यांच्याकडून हे वर्तन सतत घडत असल्याने आपली फसगत झाली. या खोटारड्या सरकारमध्ये राहून काय उपयोग? म्हणून शेवटी खासदारकीचा राजीनामा दिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात उतरलो, असे पटोले पुढे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.