आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - कर्मकांड आणि पौरोहित्य संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली. मात्र, बाबासाहेबांचे तेच अनुयायी स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची मागणी करून बौद्ध भिक्खूची पुरोहितशाही निर्माण करण्याचा खटाटोप करत आहेत, अशा शब्दांत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत टीका केली.
डॉ. आंबेडकरांनी दुसरा विवाह स्वत: कोर्टामध्ये जाऊन केला. त्यांनी बौद्धांची लग्ने भिक्खूकडूनच लावली पाहिजेत, असे कुठेही म्हटलेले नाही. हे लक्षात न घेता काही रिपब्लिकन नेते हिंदू, शीख, मुस्लिमांप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायद्याची करत असलेली मागणी हास्यास्पद आहे.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अॅट्रॉसिटीचे खटले लढवण्यासाठी राज्यातील मागासवर्गीय वकिलांच्या फोरमची स्थापना 8 एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती ढाले यांनी दिली. केवळ जामीन मिळवून देणारे वकील आम्हाला नको असल्याचे ते म्हणाले.
आरक्षण हवेच
जातीचे रकाने काढा म्हणायला अभ्यास लागत नाही, असा टोलाही ढाले यांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांना लगावला. मागासवर्गीयांना अजूनही राजकीय आरक्षणाची गरज आहे. बहुजनवादाचा काल्पनिक हत्ती निर्माण करून त्यामध्ये सर्व जातींना कोंबण्याचा प्रकाश आंबेडकरांचा खेळ अत्यंत बालीश असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.