(छायाचित्र: इंदू मिल जागेवरील बाबासाहेबांच्या संभाव्य स्मारकाचे संकल्पचित्र)
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारणार असून त्याचे भूमीपूजन येत्या 14 एप्रिल रोजी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे स्मारक उभारेल असेही त्यांनी सांगितले.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 58 वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांच्या स्मृतींना आणि त्यांनी केलेल्या अनमोल कार्याला अभिवादन करण्यासाठी हजारो भिमसैनिक दादरच्या चैत्यभूमीवर जमा झाले आहेत. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, दादरमधील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. परवानगी देतानाच केंद्र सरकार यात संयुक्त भागीदारी करणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा निर्णय घेतला आहे व आम्हालाही कळविला आहे. मी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे, संबंधित मंत्र्यांचे व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या आनंददायक वृत्तामुळे स्मारक उभारणीच्या कार्याला आता मोठी गती येणार आहे. हे स्मारक भव्य होईल आणि प्रत्येकाला डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा देणारे असेल, याची दक्षता घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक इंदू मिलच्या जागेवर उभारणार असल्याची निवेदन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबईतील चैत्यभूमीजवळच्या इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार याठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानास साजेल, असे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा तपशील राज्य सरकारशी सल्लामसलत करुन ठरविण्यात येत आहे. याविषयीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता विनाविलंब करण्यास केंद्र सरकार बांधील आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवाल यांनी म्हटले आहे.
पुढे पाहा, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले...