शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज यांची प्रकृती ठिक नसल्याने उद्धव यांनी त्यांना फोन केला होता. या दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतल्याचे वृत्त आले. त्यानंतर दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला. समजा दोघे भाऊ राजकीय हित साधण्यासाठी जर एकत्र आले तर आगामी विधानसभा निवडणुका मराठी-अमराठीच्या मुद्द्यावर लढल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत असलेली गेल्या 25 वर्षांची युती तोडली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने गेल्या 10 दिवसांपूर्वीच युती तोडण्याचा निर्णय घेतला होता, असे सूत्रांकडून समजते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना याची कल्पना होती, असेही सांगितले जात आहे. याचाच दुसरा अर्थ की एकट्याने निवडणुका लढण्याची चाचपणी आणि तयारी भाजपने पूर्वीच करुन ठेवली होती. पण शिवसेना आयत्या वेळी संकटात सापडली. तर दुसरीकडे मनसेची स्थिती गंभीर आहे. या पक्षाला सोबत घेऊन जाण्यास कुणीच तयार नाही. अशा वेळी मताधिक्य टिकवून ठेवण्याचे दोन्ही पक्षांपुढे आव्हान आहे. अशा संकटाचा मिळून सामना करण्याचा निर्णय ठाकरे बंधुंनी घेतला तर मराठी-अमराठीचा मुद्दा समोर ठेवल्याशिवाय मुख्य प्रवाहात येणे जवळपास अशक्य आहे. शिवाय शिवसेना आणि मनसेचा हा हक्काचा मुद्दा राहिला आहे. असे झाले तर इतर पक्षांना
आपल्या धोरणात मोठे बदल करावे लागतील.
पुढील स्लाईडवर वाचा, ठाकरे बंधुंनी मराठी-अमराठीचा मुद्दा प्रचारात आणला तर त्याचे काय पडसाद पडतील....