आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यातील विविध न्यायालयांमध्ये स्त्री भ्रूणहत्यांशी संबंधित चार हजार खटले दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी विधान परिषदेत दिली. विद्या चव्हाण यांनी बुलडाणा जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
स्त्री भ्रूणहत्यांच्या विरोधात महाराष्ट्राने केलेल्या धाडसी उपाययोजनांचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केल्याचे खान यांनी सांगितले. राज्यात स्त्री भ्रूणहत्यांबाबत 'एमटीपी' कायद्यान्वये 4 हजार खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 46 खटल्यांमध्ये दोषींवर आरोप निश्चित झाले असून 30 जणांना तुरुंगवास, तर 16 आरोपींना दंड ठोठावण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
शैक्षणिक क्षेत्राबाबतही श्वेतपत्रिका- राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्राची स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका आगामी अधिवेशनापूर्वी काढली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी विधान परिषदेत केली.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे व अन्य सदस्यांनी राज्यातील शालेय शिक्षणाच्या स्थितीबाबतची चर्चा उपस्थित केली होती. या वेळी बोलताना रामनाथ मोते यांनी शैक्षणिक स्थितीची श्वेतपत्रिका काढणार का असा प्रश्न विचारला होता. चर्चेला उत्तर देताना फौजिया खान यांनी सांगितले की, राज्यात प्रत्येक एक, तीन व पाच किलोमीटर अंतरावर शाळा उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मूल्यांकनाचे निकष बदलण्यात येत आहेत. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मूल्यमापमानच्या निकषांवर निर्णय घेतला जाईल.
प्राध्यापकांच्या मागण्यांवर आणि नेटसेटच्या मुद्दय़ावर बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.