रत्नागिरी - जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचा वाद रविवारी पुन्हा पेटला आहे. प्रकल्प स्थळावर मच्छिमारांसह इतर शेकडो स्थानिकांनी मोर्चा काढून प्रकल्पाविरोधात जोरदार निदर्शने केली. प्रकल्पाजवळील नाटे मोहल्ल्यात आंदोलन करण्यात आले. रविवारी सकाळीच प्रकल्पाच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली.
शिवसेनेचे नेतेही झाले सहभागी
- स्थानिकांचे आंदोलन पाहता प्रकल्पाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे स्थानिकांच्या या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनीही सहभाग नोंदवला आहे.
- शिवसेनेने यापूर्वीही जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिका घेतली आहे. जैतापूर प्रकल्पासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना खासदार अनंत गीतेंनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला होता. त्याशिवाय शिवसेनेच्या नेत्यांनीही वेळोवेळी या प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली आहे.
- दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणारच असे ठणकावून सांगितले होते. प्रकल्प खूप पुढे गेला आहे. आता माघार घेता येणार नाही. राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले.