मुंबई - नरेंद्र मोदी सरकार लवकरच काँग्रेस नियुक्त राज्यपालांना हटवून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना या सन्मानाच्या पदावर संधी देणार आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जाणार असून यात महाराष्ट्रातून वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच जयवंतीबेन मेहता यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या दोघांच्या नावांची शिफारस राज्य भाजपकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यूपीए सरकारच्या काळात निवड झालेल्या राज्यपालांना हटवण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. अधिवेशनापूर्वी यूपीएने नियुक्त केलेले बरचसे राज्यपाल पायउतार होतील आणि भाजपकडून आपल्या ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली जाईल. एकूण 10 राज्यांचे राज्यपाल बदलणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
छत्तीससगड व उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी आधीच राजीनामे दिले आहेत. मार्गारेट अल्वांची राजस्थान राज्यपालपदाची मुदत आॅगस्टमध्ये संपत आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात येणार आहे.