मुंबई - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात तीन परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यातील पहिली पायाभूत चाचणी शाळा सुरू झाल्यानंतर, तर अन्य दोन परीक्षा प्रत्येक सत्राच्या अखेरीस घेण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
पहिली ते आठवीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याबाबतचा प्रश्न हुस्नबानो खलिफे, डॉ सुधीर तांबे, दीप्ती चौधरी आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. अशा चाचण्यांमुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल व शिक्षणाचा दर्जाही सुधारेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
आरटीईचा सोयीनुसार अर्थ
शिक्षण हक्क कायद्यात पहिली ते आठवी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद नाही. परंतु काही शाळा व संस्थाचालकांनी आरटीईचा सोयीस्कर अर्थ लावला. परीक्षा झाल्यानंतर त्याच इयत्तेत न बसवता विद्यार्थ्याला उपचारात्मक शिक्षण देऊन पुढच्या इयत्तेत पाठवणे अपेक्षित आहे. त्यामुळे परीक्षेवर आम्ही ठाम आहोत. - विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री