मुंबई- विद्यापीठाच्या निकालाची डेडलाईन पाळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, तेव्हा त्यांच्यावर हक्कभंग का आणू नये असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर जोरदार टीका केली.
तावडेंच्या कारभारापेक्षा आधीचे सरकार बरे होते. शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाची केस दाखल करायला हवी, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्हाला पारदर्शकता हवी आहे, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
- मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एक डेडलाईन दिली होती ती उलटली. मग आता मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणायचा का?
- मुंबईबाहेर पडल्यावर मोबाईल नेटवर्क मिळत नसेल, तर शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज कसे भरतील?
- सिनेटची निवडणूक लांबली, त्यामागे काय कारणे, हे कळाले पाहिजे
- कुलगुरुंना काढून प्रश्न सुटणार नाहीत, तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
- शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाची केस दाखल केली पाहिजे, या विषयावर मी पंतप्रधानांची वेळ मगितली आहे.
- राज्यमंत्र्यांना किती अधिकार असतो, हे पाहिले पाहिजे. या खात्यात आम्हाला कॅबिनेट पदाचा दर्जा द्यावा, मग दाखवू कसे काम होते.