मुंबई- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे वगळता एकही मंत्री प्रभावी नाही. त्यामुळे हे सरकार फार प्रभावीपणे काम करेल असे
आपल्याला वाटत नाही असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. शिवसेना व शिवसेनेचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. आज साहेब असते तर त्यांनी सत्तेवर लाथ मारत कमळाबाईला धडा शिकवला असता अशी फटकेबाजीही राणे यांनी केली.
नारायण राणे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. निवडणुकीत पराभव झाल्याचे सांगत आता निवांत असून मोकळे मोकळे वाटतंय अशी टिप्पणीही त्यांनी केली. यावेळी राणे यांनी भाजप शिवसेनेसह स्वपक्षाबाबतही तिरकस भाष्य केले.
राणे म्हणाले, भाजपच्या मंत्रिमंडळात प्रभावी मंत्र्यांचा अभाव आहे. देवेंद्र फडणवीस हुशार, अभ्यासू आहेत पण त्यांच्यात राजकीय चार्तुर्य नाही. प्रशासन व सरकार चालविताना या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसेंसारखा अनुभवी व प्रभाव पाडणारा एकही नेता नाही. त्यामुळे हे सरकार लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल असे अजिबात आपल्याला वाटत नाही. फडणवील यांनी स्वत:च टोलबाबत घुमजाव केले आहे. सत्तेच्या आधी हेच फडणवीस टोल माफ करू असे सांगत होते मात्र आता त्यांनी त्यावर घुमजाव केले आहे. यावरूनच भाजपचे खरे रूप समोर येणार आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकारवर शहा-मोदींचा प्रभाव राहणार आहे. त्यांच्या आदेशाशिवाय फडणवीस काही काम करू शकतील असे आपल्याला वाटत नाही. ते केवळ नामधारी मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार जनतेसाठी काम करू शकेल असे वाटत नाही. राज्यातील जनतेला अच्छे दिन येणारच नाहीत असेही राणेंनी म्हटले.
फडणवीस यांनी अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असताना वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये, जर त्यांना आताच विदर्भ वेगळा हवा असेल तर खुर्ची सोडून ही भाषा करावी, असे सांगून राणे म्हणाले, गुजराती उद्योगमंत्री करून महाराष्ट्राचे भले होणार आहे का?. उद्या जर जपान, जर्मनीतील एखादा उद्योग महाराष्ट्रात येऊ घातला आणि गुजरातमधून आदेश आला की तो आमच्याकडे पाठवा तर प्रकाश मेहता याला नकार देऊ शकणार आहेत का. यातून राज्याचे हित ते काय साधणार आहेत, अशी टिका राणेंनी केली.
भाजपने शिवसेनेची काय किंमत आहे ते दाखवून दिले आहे. तरीही सेनेचे नेतृत्त्व सत्तेसाठी लाचारी करीत आहे. आता यापुढे शिवसेनेने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नयेत. बाळासाहेब आज असते तर त्यांनी प्रथम सत्तेवर लाथ मारली असती व कमळाबाईला धडा शिकवला असता. पण आज ती धमक उद्धव ठाकरे यांच्यात राहिलेली नाही. शिवसेना सत्तेसाठी एवढी लाचार होईल असे आपल्याला वाटले नव्हते, असेही राणेंनी सेनेवर टीका केली.
काय काय म्हणाले राणे...
- पंतप्रधान
नरेंद्र मोदींचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
- फडणवीस दिल्ली आदेशाशिवाय काहीच करू शकणार नाहीत. आमचीही काहीशी तशीच स्थिती होती.
- कोकणातील जनतेने आपल्याला विजयी केले आणि पराभूतही केले
- मी जनतेची कामे करूनही पराभूत झालो आहे
- यापुढे विधानसभा निवडणूक लढविणार नाही
- विधानपरिषद, राज्यसभा, लोकसभेवर जाईन
- एमआयएमचे विचार देशाला घातक आहेत, त्यांना चाप लावला पाहिजे
- पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत
- एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपद खेचून आणण्यात कमी पडले
- बहुजन मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यावर आता बोलून काय उपयोग.
पुढे आणखी वाचा, राणेंनी काय-काय फटकेबाजी केली...