मुंबई - ‘उद्योगमंत्री नारायण राणे हे मुलगा निलेशचा पराभव पचवू शकले नाहीत. त्यामुळे ते विरोधकांबरोबर मित्रपक्षावरही टीका करत सुटलेले आहेत. मात्र आपल्या मुलालाही निवडून न आणू शकणार्या राणेंना आरोप करण्याचा अधिकार नाही’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ‘निवडणुकांमध्ये जय पराजय होतच असतो. विजयाने जसे हुरळून जायचे नसते, तसेच पराभवाने खचून जाता कामा नये. आपल्या मुलाच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप राणे नैराश्यातून करत आहेत. त्यांनी आधी राजीनामा देऊन काँग्रेसवर दबाव आणला. तसेच गेली 25 वर्षे मी ज्या कोकणातील माणसांसाठी काम केले, त्या जनतेने जाण ठेवली नाही, असे खापरही फोडले. हा प्रकार म्हणजे संयमाचा अभाव असल्याचे लक्षण आहे.’
नक्कल करणार्यांना चपराक
राष्ट्रवादी काँगे्रेस पार्टी नावाने राजकीय पक्षाची नोंदणी करण्यासाठी कमलेश श्रीवास्तव व विनोद गंगवाल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. यावर राष्ट्रवादीकडून हरकत घेण्यात आली होती. आयोगाने ही हरकत मान्य करत श्रीवास्तव व गंगवाल यांचा अर्ज फेटाळला. नॅशलिस्ट काँग्रेस पार्टीचे मराठीत भाषांतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होते. त्यामुळे इतरांना तशा नावाने पक्ष नोंदणीसाठी अर्ज करता येणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.