मुंबई-
फेसबुक, वॉट्स अॅपसह इतर सोशल नेटवर्क साईटवर यापुढे आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणारे, त्या मजकूराला लाईक व शेअर करणा-यांवरही यापुढे गुन्हे दाखल केले जातील असे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज म्हटले आहे.
मागील आठवड्यात राज्यातील महापुरुषांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे राज्यात मागील 8-10 दिवसापासून तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान पुण्यात मोहसिन शेख नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या करण्यात आली होती. ही हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती. शेख याने हा मजकूर पोस्ट केल्याचा हिंदु राष्ट्र सेनेला होता. मात्र यात शेख याचा कोणताही सहभाग नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितले. तसेच बदनामीच्या या पोस्ट परदेशातून टाकल्याचे पुढे आले आहे. मात्र, यातून एका निष्पाप युवकांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापुढे आक्षेपार्ह मजकूर टाकणारे, त्याला लाईक व शेअर करणा-यांवर यापुढे गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती गृहमंत्री पाटील यांनी दिली.
हिंदु राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल. पोलिस या संघटनेविरोधात पुरावे गोळा करीत आहे असेही पाटील यांनी सांगितले.