आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडावर पुन्हा जागा होणार शिवकालीन इतिहास, तब्बल पाच कोटींचा खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा रायगड महोत्सवाच्या निमित्ताने जागा केला जाणार आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई रायगड किल्ल्यावर शिवकालीन देखावे उभे करून पर्यटकांना शिवकाळात नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एखाद्या किल्ल्यावर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे साजरा करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या या महोत्सवासाठी सांस्कृतिक खाते तब्बल पाच कोटी रुपये खर्च करणार आहे.

मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रायगड महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती दिली. ‘शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे परंतु त्यावेळचे वातावरण कसे होते, शिवाजी महाराज गडावर कसे राहत, कसा कारभार करीत याची ऐकीव माहिती आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही शिवकालीन काळ उभा करणार असून तो पर्यटकांना अनुभवता यावा आणि रायगड जागतिक पर्यटकांच्या नकाशावर यावे यासाठीच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून परवानगी घेतली असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता हा २२ ते २४ जानेवारीदरम्यान शिवकालीन इतिहास आयोजित करण्यात येणार आहे.२१ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. २२ तारखेपासून पर्यटकांसाठी हा महोत्सव खुला होणार असून तो सर्वांसाठी मोफत असेल. या महोत्सवासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या होत्या आणि नितीन देसाई यांची निविदा यासाठी निवडण्यात आली.’
स्थानिकांना मिळणार रोजगार : तावडे
या महोत्सवाच्या निमित्ताने रायगडावर एक हजार कलाकारांच्या मदतीने शिवकालीन इतिहास जिवंत केला जाणार आहे. या महोत्सवामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. देशभरातील पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पार्किंगपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ वाड्यालगत विस्तीर्ण माळरानावर शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग जिवंत केले जाणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गड- किल्ल्यांच्या फोटोंचे प्रदर्शनही येथे आयोजित करण्यात आले आहे. किल्ल्यावरील महादरवाजा, सभामंडप, राणीवसा,अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधिस्थळांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहीर, वासुदेव, भारूडकार आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.