मुंबई- काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मागील तीन दिवसांपासून मुंबई पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी शहर तसेच उपनगरांत पडलेल्या संततधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: चिंब केले. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. पूर्व उपनगरांत पावसाचा जोर जास्त होता. केवळ मुंबईच नाही, तर भिवंडी, पालघर, ठाणे जfल्ह्यालादेखील पावसाने झाेडपून काढले. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई व उपनगरांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सकाळपासूनच पावसाची संततधार दिवसभर सुरू हाेती. परंतु संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मात्र सुरू झालेल्या मुसळधार पावसाने एकच दैना उडवली. एेन कार्यालय सुटण्याच्या सुमारासच पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ झाली. कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांदिवली, दादर, परळ आदी सखल भागात पाणी साचले होते. रेल्वे वाहतूक उशिराने सुरू होती. शिवाय अनेक रस्त्यावरील वाहतुकीवरही काही काळासाठी परिणाम दिसून झाला.