मुंबई- शिवसेनेसोबतची 25 वर्षापासून असलेली युती यापुढे कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, जागावाटपाबाबत शिवसेनेने दिलेला फॉर्म्यूला जुनाच आहे. सेनेने मागील 25 वर्षापासून ज्या 59 जागा जिंकल्या नाहीत व भाजपने ज्या 19 जागा कधीही जिंकल्या नाहीत त्यावर चर्चा करावी अशी आमची मागणी आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार सन्मानजनक व समाधानकारक जागा सेनेने भाजपला सोडाव्यात, असे सांगत शिवसेनेकडे नवा प्रस्ताव देणार असल्याची माहिती भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे.
प्रदेश भाजप नेत्यांची मुंबईत आज दुपारी निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर, राजीवप्रताप रूडी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, मुनगुंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर खडसे आणि मुनगुंटीवर यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली.
मुनगुंटीवर म्हणाले, राज्यात शिवसेनेसोबत महायुती टिकावी अशीच आमची इच्छा आहे. शिवसेनेने आमच्यासोबत युती ठेवल्यानंतर अनेकदा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा देणे असो, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देणे शिवसेनेने एनडीएच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही टिकवली. आताही आमची युती टिकावी अशी आमची भावना आहे. मात्र सेनेने जो 119 जागांचा प्रस्ताव दिला आहे तो जुना आहे व आम्हाला मान्य नाही. मागील 25 वर्षात सेनेने ज्या 59 जागा कधीही जिंकल्या नाहीत व भाजपने 19 जागा जिंकल्या नाहीत त्यावर बदलत्या परिस्थितीनुसार चर्चा करावी व त्यात काही अदलाबदल व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यानुसार जागावाटप व्हावे अशी भूमिका मुनगुंटीवर यांनी मांडली.
खडसे म्हणाले, भाजप यापूर्वी लोकसभेला 32 जागा लढवायचा. मात्र हळू हळू सेनेने आमच्याकडून 6 जागा हिसकावल्या. आताही रामदास आठवलेंना आम्ही आमच्या कोट्यातून संधी दिली. भाजप नेहमीच नमती बाजू घेत आला आहे. आताही युती टिकावी अशी कार्यकर्त्यांसह आमची इच्छा आहे. शिवसेनेने भाजपला काही जागा सोडल्या पाहिजेत.