(पप्पू कलानीला पोलिस कोर्टात घेऊन जात असतानाचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- उल्हासनगरचे माजी आमदार व नगरसेवक पप्पू कलानी याची जन्मठेप सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. 25 वर्षांपूर्वीच्या इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला सेशन कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर कलानीने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र तेथे त्याच्या हाती निराशा लागली होती. त्यानंतरही कलानीने सेशन कोर्ट व हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता तेथेही त्याच्या पदरी निराशा पडली आहे. पप्पू कलानी सध्या अजन्म तुरूंगावासाची शिक्षा पुण्यातील येरवडा कारागृहात भोगत आहे.
कल्याणच्या सेशन कोर्टाने 3 डिसेंबर 2013 रोजी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात कलानी याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने कलानींची याचिका फेटाळत कल्याण सेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर चार महिन्यापूर्वी कलानीने अखेरचा प्रयत्न म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सेशन व मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला.
27 फेब्रुवारी 1990 रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर घनश्याम भटिजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटिजा यांनी करत
आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र 28 एप्रिल 1990 रोजी सकाळी इंदरच्या अंगरक्षकाचीच बंदूक काढून घेत इंदरवर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी पप्पू कलानीला दोषी धरले होते. त्याला सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानीचा उल्हासनगरमध्ये मोठा थाट आहे. तो तेथून आमदार म्हणून निवडून आला होता. तसेच उल्हासनगर नगरपरिषदही अनेक वर्षापासून त्याच्याच ताब्यात आहे. कलानीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात त्याने पत्नी ज्योती कलानीला उतरले होते. कलानीची पत्नी ज्योती या उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान
नरेंद्र मोदींची म्हणजेच भाजपची लाट असतानाही ज्योती कलानी यांनी भाजपचे आमदार कुमार आयलानींचा पराभव केला होता. यावरून पप्पू कलानीचे उल्हासनगर भागावर असलेले वर्चस्व सिद्ध होते.