मुंबई- यूपीए सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकायचे होते. तसा तत्कालीन यूपीए सरकारमधील काही मंत्र्यांनी प्रयत्नही केला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
मोह भागवत यांना 'हिंदु दहशतवादी' म्हणून अडकवण्याचा तत्कालीन काँग्रेस सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता, असे या वृत्तात म्हटले आहे. अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटांच्या मागे ‘हिंदु दहशतवाद थिअरी’ असल्याचे यूपीए सरकारने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांना अडकवण्याचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता. यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) बड्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता.
मालेगाव, अजमेर आणि इतर ठिकाणी झालेल्या स्फोटांप्रकरणी मोहन भागवत यांची चौकशी करून अधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घ्यायचे होते. सर्व अधिकारी यूपीए सरकारच्या आदेशानुसार काम करत होते. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता, असेही इंग्रजी वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.